बीएसएफचे जवान रघुनाथ चिमले यांना त्रिपुरा येथे विरगती पालम तालुक्यातील सिरपूर येथे होणार अंत्यसंस्कार

पालम : तालुक्यातील सिरपूर येथील भूमिपुत्र रघुनाथ मोतीराम चिमले (वय ४०) यांना त्रिपुरा येथे भारतीय सीमा सुरक्षा दलात कर्तव्यावर असताना वीरगती प्राप्त झाली. ते स्वेच्छानिवृत्ती घेण्याच्या उंबरठ्यावर असताना रघुनाथ चिमले यांच्यावर काळाने झडप घातल्याने त्यांच्या कुटुंबीयांसह गावावर दुःखाचा डोंगर कोसळला.
रघुनाथ चिमले तीन अपत्यामध्ये ज्येष्ठ होता. त्याच्या पाठीवर लहान भाऊ आणि एक बहीण. वडील कोतवाल आणि आई गृहिणी होती. वडीलाकडूनच उपजतच त्याला ताकतीचे वरदान मिळाले होते. अगदी कुटुंबच ताकदीची पूजा करायचं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. त्यानुरूप रघुनाथ यांनी अंगातील बळ भारतमातेच्या सेवेसाठी खर्च करण्याचा निर्णय घेतला. त्याला सिरपूर येथील सैनिकांची संख्या जास्त असल्याची पार्श्वभूमी कारणीभूत होती. त्याचे जिवलग मित्र सैन्य दलाची तयारी करायचे आणि काही सैन्यांमध्ये देखील होते. म्हणून रघुनाथने तयारी करायला सुरुवात केली. आणि अगदी दुसऱ्याच भरतीत २००३ मध्ये सीमा सुरक्षा दलात निवडला गेला. त्यानंतर त्याने जम्मू व कश्मीर, आसाम, पश्चिम बंगाल आदी राज्यात २० वर्षे सेवा बजावली. दरम्यान, दोन वर्षांपूर्वी आजाराने गाठले. त्यावर वेगवेगळ्या रुग्णालयात रुग्णांनी उपचारही घेतले. उपचाराला शरीराने साथ दिल्याने प्रकृती ठणठणीत झाली होती. म्हणून ते त्रिपुरा राज्यात कर्तव्यावर होते. तिथे प्रकृती बिघडल्याने त्यांना आगरताळा येथील शासकीय दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यांना लिव्हरच्या गंभीर आजाराने ग्रासले होते. त्यांच्यावर मागील ८ दिवसापासून त्रिपुरा राज्याची राजधानी असलेल्या आगरताळा येथील सैनिकी शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होते. दरम्यान उपचार सुरू असताना १ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५.१० मिनिटांनी रघुनाथ यांची प्राणज्योत मालवली.
स्वेच्छानिवृत्ती पात्रतेच्या उंबरठ्यावर
रघुनाथ यांनी भारतमातेची दीर्घकाळ सेवा केली. जम्मू कश्मीर, पश्चिम बंगाल आणि आसाम राज्यात त्यांनी सेवा बजावली. ते सध्या स्वेच्छानिवृत्ती पात्रतेच्या उंबरठ्यावर होते. वास्तविक त्यांची रिटायरमेंट ५८ व्या वर्षी असते; परंतु जवळपास २० वर्षे सेवा झाल्याने आणि प्रकृती अस्वस्थामुळे स्वेच्छानिवृत्ती घेण्याच्या विचाराधीन होते.
सोमवारी दुपारी १२ वाजता रघुनाथ चिमले यांच्या पार्थिव देहाची उत्तरीय तपासणी होणार आहे. तदनंतर सीमा सुरक्षा बलाच्या ताब्यात पार्थिवदेह जाईल. येथील कायदेशीर आवश्यक प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर रघुनाथ चिमले यांचा पार्थिवदेह कोलकत्याला आणला जाईल. येथून विमानाद्वारे मुंबई किंवा औरंगाबाद येथे 3 ऑक्टोबर रोजी पार्थिवदेह आल्यानंतर सिरपूर येथे येणार असल्याची माहिती चांदुजी चिमले यांनी दिली.



